सलग ३ सामन्यांत पराभव स्विकारल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या मुंबई इंडियन्ससमोर उभा ठाकला होता.मुंबई इंडियन्सने आपले प्ले ऑफ मधील स्थान पक्के केले होते पण दिल्लीचा संघ एका विजयासाठी झगडत आहे.मुंबईचा कर्णधार किरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.मुंबईने हार्दिक पंड्याला विश्रांती दिली होती. हार्दिक व पॅटिन्सनच्या जागी जयंत यादव व कुल्टर नाईलला तर दिल्लीने रहाणे,तुषार देशपांडे व अक्षर पटेलच्या जागी पृथ्वी शॉ,हर्षेल पटेल व नवोदित प्रविण दुबेला संघात स्थान दिले होते.
फलंदाजीला आलेल्या पृथ्वी शॉ व शिखर धवन कडुन संघाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती पण ट्रेंट बोल्टने तीसऱ्याच चेंडूवर शिखरला शून्यावर सुर्यकुमार यादवकरवी झेलबाद करत संघाला शानदार सुरुवात करुन दिली होती.त्यानंतर बोल्टच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पृथ्वी शॉ बाद झाला होता. ३ षटकांत १५ धावांत २ गडी गमावल्यामुळे दिल्लीचा संघ चांगलाच अडचणीत आला होतात्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यर व रिषभ पंतवर मोठी जिम्मेदारी आली होती.दोघेही संघाचा डाव हळुहळु पुढे नेत होते पण मुंबईच्या गोलंदाजांनी अय्यर व रिषभला चांगलेच जखडुन ठेवले होते.११ व्या षटकांत गोलंदाजीस आलेल्या राहुल चहरच्या दुसऱ्याच चेंडूवर श्रेयस २५ धावांवर यष्टिचित झाला तेव्हा दिल्लीने ५० धावा केल्या होत्या.त्यानंतर पुढच्याच षटकांत बुमराह स्टॉयनिस व पंतला बाद करत संघाला सामन्यांवर चांगली पकड मिळवून दिली होती. ६२ धावांत ५ गडी गमावल्यामुळे दिल्लीचा संघ चांगलाच अडचणीत सापडला होता शेवटी अश्विन व रबाडाने प्रत्येकी १२ तर हेटमायरने ११ धावा करत संघाला निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावत ११० धावांपर्यंत पोहचवले.मुंबईकडुन बुमराह व बोल्टने प्रत्येकी ३ तर कुल्टर नाईल व राहुल चहरने प्रत्येकी १ गडी बाद केला होता.
१११ धावांचे लक्ष्य तसे मोठे नव्हते पण सलामीवीर क्विंटन डी कॉक व इशान किशनने सावध सुरुवात केली होती पण जम बसल्यानंतर इशान दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत होता.इशानचा आक्रमक पवित्रा पाहता डी कॉकने सावध खेळण्यास प्राधन्य दिले होते. मुंबईचा संघ किती षटकांमध्ये विजय मिळवतो याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष्य होते त्यातच ११ व्या षटकांत डी कॉक (२६) नॉर्खियाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. डी कॉक बाद झाला तेव्हा मुंबईला ५८ चेंडूत ४३ धावांची आवश्यकता होती.१२ व्या षटकांत इशानने आयपीएल २०२० मधील आपले तिसरे अर्धशतक साजरे केले होते.इशान सामना लवकर संपवण्यास उत्सुक होता.१५ व्या षटकांतील दुसऱ्या चेंडूवर स्केअर लेगला शानदार षटकार मारत इशानने मुंबई इंडियन्सला ९ गडी राखुन विजय मिळवून दिला आणि या विजयासोबतच मुंबईने गुणतालिकेतील पहिल्या दोन संघातील स्थान निश्चित केले. इशान ७२ तर सुर्यकुमार यादव १२ धावांवर नाबाद राहिले तर दिल्लीकडुन एकमेव गडी नॉर्खियाने बाद केला. ४७ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी करणाऱ्या इशान किशनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. दिल्लीला प्ले ऑफ मधील आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध विजय मिळवणे आवश्यक आहे.
शंतनु कुलकर्णी
Leave a Reply